बुलढाणा (हॅलो बुलडाणा) राष्ट्रसंतांच्या पावनभूमीत, गुरुकुंज मोझरी येथे प्रहार जनशक्ती पक्षाचे संस्थापक अध्यक्ष बच्चू कडू यांनी सुरू केलेल्या अन्नत्याग आंदोलनाचा आज सहावा दिवस आहे. शेतकऱ्यांच्या कर्जमुक्तीसाठी, दिव्यांगांना ६ हजार रुपये मानधन मिळावे यासाठी आणि अन्य अनेक न्याय मागण्यांसाठी त्यांनी आपले प्राण पणाला लावले आहेत. मात्र, सहा दिवस उलटूनही ‘दळभद्री’ सरकारने या आंदोलनाची कोणतीही दखल घेतली नसल्याने, उद्या बुलढाणा जिल्ह्यात ठीक ठिकाणी चक्काजाम आंदोलन करण्यात येणार असून या आंदोलनात समाजातील सर्वच घटकांनी सहभागी व्हावे, असे आवाहन प्रहार सेवक वैभवराजे मोहिते यांनी केले आहे.
डोळ्यात अश्रू आणि मनात आग घेऊन बसलेल्या बच्चू कडूंच्या या एकनिष्ठ संघर्षाला महाराष्ट्रातील कानाकोपऱ्यातून पाठिंबा मिळत आहे. उद्या १५ जून रोजी राज्यभर चक्काजाम आंदोलनाची हाक देण्यात आली आहे. या आवाहनाला प्रतिसाद देत, बुलढाणा जिल्ह्यातही ठिकठिकाणी चक्काजाम आंदोलन करण्यात येणार आहे. “या आंदोलनात प्रहारचे पदाधिकारी, कार्यकर्ते, शेतकरी, शेतमजूर आणि ग्रामपंचायत कर्मचारी यांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे. आपल्या अन्नदात्याच्या डोळ्यातून पाणी येताना आणि दिव्यांगांच्या वेदना असह्य होत असताना, आपण शांत कसे बसू शकतो? हा लढा केवळ बच्चू कडूंचा नाही, तर तो आपल्या सर्वांचा आहे. आपल्या हक्कांसाठी, आपल्या अस्तित्वासाठी, या ‘दळभद्री’ सरकारला जागे करण्यासाठी आपल्याला रस्त्यावर उतरावेच लागेल.”शेतकऱ्यांच्या जीवनातील अंधार दूर करण्यासाठी, दिव्यांगांच्या आयुष्यात आशेचा किरण पेरण्यासाठी, बच्चू कडूंचे हे बलिदान व्यर्थ जाऊ नये. यासाठी बुलढाणा जिल्ह्यातील प्रत्येक व्यक्तीने या आंदोलनात सहभागी होऊन आपल्या एकजुटीची ताकद दाखवावी आणि सरकारला आपल्या मागण्या मान्य करण्यास भाग पाडावे, असे आवाहन प्रहार सेवक वैभवराजे मोहिते यांनी केले आहे.