जळगाव जामोद (हॅलो बुलडाणा) महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या आज खामगाव दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर, शेतकरी प्रश्न उपस्थित करणाऱ्या युवा आंदोलक अक्षय पाटील आणि वैभव जाणे यांना आज सकाळी पोलिसांनी घरून अटक केली.
राज्यातील शेतकरी आज अक्षरशः मरणाच्या उंबरठ्यावर उभा आहे. सोयाबीन, कापसाला भाव नाही, पीकविमा मिळत नाही, कर्जमुक्तीचं आश्वासन हवेत विरलंय. अशा गंभीर परिस्थितीत कृषिमंत्री माणिकराव कोकाटे माध्यमांसमोर वादग्रस्त वक्तव्य करत शेतकऱ्यांच्या जखमेवर मीठ चोळत आहेत. त्यांना सवाल विचारणे गुन्हा का?महायुती सरकारने निवडणुकीपूर्वी जाहीरनामा गाजवला “शेतकऱ्यांची सरसकट कर्जमाफी करू”, मात्र आता तेच सरकार आंदोलन करणाऱ्यांना अटक करत आहे. हे सरकार आश्वासनांवर निवडून आले, आणि आता शेतकऱ्यांच्या आवाजाला पोलिसांच्या माध्यमातून गाडत आहे.
अजित पवारांच्या दौऱ्यापूर्वीच आंदोलकांची अटक म्हणजे लोकशाहीची गळचेपी. आंदोलकांनी स्पष्ट केलं .पोलिसांनी कितीही वेळा अटक केली तरी आम्ही शेतकऱ्यांसाठी लढत राहणार. हा लढा आता निर्णायक टप्प्यात पोहचला आहे.‘दादा, काय झालं तुमचं वचन?’ असा सवाल आता रस्त्यावर घुमतोय… आणि या आवाजाला कुणीही थांबवू शकत नसल्याचे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे