बुलढाणा (हॅलो बुलडाणा) आषाढ वारी निमित्ताने ब्रह्मचित्कला आदिशक्ती मुक्ताई पालखीचे सोमवारी मोठ्या दिमाखात बुलढाण्यात सायंकाळी आगमन झाले. यावेळी भाविकांनी मुक्ताईचे दर्शन घेत हरिनामाचा जयघोष केल्याने परिसर दुमदुमून गेला होता.यावेळी आमदार संजय गायकवाड यांच्या हस्ते पूजन करण्यात आले. मुक्ताईनगर कोथळी येथून मुक्ताईची या दिंडीने पंढरपूर कडे प्रस्थान केले आहे.
मुक्ताईनगर कोथळी ते मलकापूर – मोताळा मार्गे श्री संत ब्रह्मचित्कला आदिशक्ती मुक्ताई पालखीचे शहरात सायंकाळी पाचच्या दरम्यान आगमन झाले. सकाळी सहा वाजता मोताळ्यातून आदिशक्ती मुक्ताबाईचे प्रस्थान झाले होते. दरम्यान राजूर येथे सकाळी महाप्रसाद त्यानंतर राजुरच्या घाटातून टाळ मृदुंगाच्या गवळणी, संत अभंगवाणी गात आनंद उत्सव साजरा करीत संकट मोचन हनुमान मंदिरामध्ये काही वेळ पालखी थांबली होती. त्यानंतर हरिपाठ प्रारंभ करून बुलढाणा नगरीमध्ये सायंकाळी पाच दरम्यान ही पालखी पोहोचली आणि असंख्य भाविक मुक्ताईच्या चरणी नतमस्तक झाले. ६ जून रोजी मुक्ताईनगर कोथळी वरून आदिशक्ती मुक्ताई चे प्रस्थान पंढरपूरच्या दिशेने झालेले आहे. दिंडी प्रमुख मुक्ताई शिष्यशिरोमणी रवींद्र महाराज हरणे यांच्या मार्गदर्शनात तापितीर ते भिमातीर ७०० किलोमीटर पायी दिंडी सोहळा सलग ३०० सोळाव्या वर्षी सलग निघाला आहे. दिंडी सोहळ्यात मुक्ताई संस्थांनचे अध्यक्ष रवींद्रभैय्या पाटील, मुक्ताई फळावरील सर्वश्री हभप रतिराम महाराज, नितीन महाराज, विशाल महाराज खोले,अमोल महाराज कासलीकर,पंकज महाराज, लखन महाराज, सतीशचंद्र रोठे पाटील,विजय महाराज खवले, निनाजी महाराज खोडके यांच्यासह महाराष्ट्रातील नामवंत, कीर्तनकार,प्रवचनकार, टाळकरी, विणेकरी, मृदुंगाचार्य, गायनाचार्य, पताकाधारी, वारकरी,महिला, अबाल- वृध्द यांच्यासह मध्य प्रदेश, महाराष्ट्र, गुजरात, कर्नाटक चार राज्यातील मुक्ताई सेवक वयाच्या सातव्या वर्षापासून तर ८५ वर्षापर्यंत मुक्ताई दिंडी सोहळ्यात सामील झाले आहे.
▪️मुक्ताई दिंडीत आमदार चैनसुख संचेती सहभागी!
मुक्ताईनगर कोथळी नंतर मलकापुरात प्रथम आगमनासाठी स्थानिक लोकप्रतिनिधी आणि मलकापूर वासीयांनी आदिशक्तीचे भव्य दिव्य स्वागत करीत वारकऱ्यांच्या निवासाचे आणि महाप्रसादाचे उत्कृष्ट आयोजन केले.तर विद्यमान आमदार चैनसुख संचेती यांच्यासह लोकप्रतिनिधी मलकापूर पासून दाताळ्यापर्यंत नऊ किलोमीटर आदिशक्ती मुक्ताबाईला निरोप देण्यासाठी पायी दिंडीत सहभागी झाले होते.
▪️पंढरपुरात प्रथम प्रवेशाचा मान!
दरवर्षी वारी आषाढी एकादशीला विठ्ठल रखुमाईच्या भेटीसाठी पंढरपुरात प्रथम प्रवेशाचा मान ज्या संतश्रेष्ठ माऊलीच्या दिंडीला दिला जातो. त्या संत मुक्ताईंच्या दिंडीला तीन शतकांपेक्षा अधिक वर्षांची परंपरा लाभली आहे. जळगाव जिल्ह्यातील कोथळी येथील संत मुक्ताई संस्थानाच्यावतीने दिंडी दरवर्षी काढण्यात येते. दिंडीचे यावर्षीचे हे ३१६ वे वर्ष आहे. आळंदीतून निघणारी संत ज्ञानेश्वरांची दिंडी, देहूतून निघणारी संत तुकोबांच्या दिंडी एवढेच महत्त्व जळगाव जिल्ह्यातून निघणाऱ्या संत मुक्ताईच्या दिंडीला देखील आहे.
▪️महाराष्ट्रातील सर्वात लांब पल्ल्याची पालखी!
आषाढी एकादशीला पंढरपुरात भरणाऱ्या यात्रेवेळी विठ्ठल रखुमाईसह संत ज्ञानेश्वर, संत निवृत्तीनाथ, संत तुकोबारायांच्या भेटीसाठी मुक्ताई निघतात अशी वारकऱ्यांची भावना आहे. महाराष्ट्रातील सर्वात लांब पल्ल्याची दिंडी म्हणून संत मुक्ताईच्या दिंडीची ओळख आहे. कोथळी गावात असलेल्या मुक्ताईच्या जुन्या मंदिरापासून दिंडीला सुरुवात झाली.
संत मुक्ताईची दिंडी खानदेश, विदर्भ, मराठवाडा, तसेच पश्चिम महाराष्ट्रातून मार्गक्रमण करत ३३ दिवसांत तब्बल ७५० किलोमीटरचे अंतर पार करत पंढरपुरात दाखल होते.