spot_img
spot_img

गोवंश प्राण्यांची अवैध तस्करी कराल तर… खबरदार! – काय म्हणाले जिल्हाधिकारी पाटील?

बुलडाणा (हॅलो बुलडाणा) येत्या 7 जून रोजी बकरी ईद सण जिल्ह्यात उत्सहात साजरा होणार आहे. या पार्श्वभूमीवर नागरिकांनी शांतता व सौहार्दपूर्ण वातावरणात सण साजरा करावा, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. किरण पाटील यांनी केले आहे. गोवंश प्राण्यांची अवैध तस्करी कराल तर… कारवाई होणार आहे.बकरी ईद सणाच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात शांतता, सलोखा व सामाजिक ऐक्य अबाधित राखण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या नियोजन सभागृहात शांतता समितीची बैठक घेण्यात आली. या बैठकीस पोलीस अधीक्षक निलेश ताबें, अतिरिक्त जिल्हाधिकारी सुधीर खांदे, अपर पोलीस अधिक्षक बि.बि. महामूनी, निवासी उपजिल्हाधिकारी सुहासिनी गोणेवार, उपविभागीय अधिकारी, उपविभागीय पोलीस अधिकारी, तहसिलदार, पोलीस अधिकारी व विविध विभागांचे अधिकारी तसेच धर्मगुरू, सामाजिक संघटना प्रतिनिधी आदी उपस्थित होते.

जिल्हाधिकारी डॉ. पाटील म्हणाले की, बकरी ईद सणाच्या निमित्ताने जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणात जनावरांची वाहतुक करण्यात येते. याप्रसंगी पशुसंवर्धन विभागाने जनावरांची वाहतूकीपुर्वी स्वास्थ्य तपासणी करून प्रमाणपत्र द्यावे. पशुसंवर्धन विभागाने पोलीस विभागाच्या समन्वयाने जनावरांसाठी सुरक्षितता निर्माण करून जिल्ह्यात गोवंश प्राण्यांची अवैध तस्करी होणार नाही, याबाबत दक्षता घ्यावी. जनावरांची अवैध वाहतुक आढळल्यास तसेच प्राणी क्लेश प्रतिबंध कायद्याचे पालन न झाल्यास त्वरीत पोलीसांना सूचित करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी यांनी केले आहे.

बकरी ईद उत्सवाच्या दरम्यान ग्रामीण व नागरी वस्तीमधील विद्युत पुरवठा खंडीत होणार नाही, यांची खबरदारी घ्यावी. बाजारपेठ, कत्तलखाणे व इत्तर ठिकाणी स्वच्छता राहिल यांची दक्षता नगरपालिका व संबधितांनी घ्यावी, असे सूचना यावेळी दिल्या. तसेच सण उत्सवाच्या काळामध्ये समाजमाध्यमावर काही समाजकंठकाकडून धार्मिक तेढ निर्माण होणारे संदेश पसरवितात. अशा अफवावर विश्वास न ठेवता संदेश पसरविणाऱ्या व्यक्तीची माहिती पोलिसाकडे कळविण्याचे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. पाटील यांनी केले.

पोलीस विभागाने शहर व गावांमध्ये बंदोबस्त योजना आखली असून, चोख पोलीस बंदोबस्त ठेवण्यात येणार आहे. तसेच राज्यात संपूर्ण गोवंश हत्याबंदी कायदा लागू असून या कायद्याची काटेकोर अंमलबजावणी व्हावी. वाहतूक करताना महाराष्ट्र मोटार वाहन कायद्याचे पालन व्हावे. कोणतीही अवैध कत्तल किंवा वाहतूक होऊ नये. धर्मगुरूंनी समाजात शांतता व बंधुभाव कायम ठेवण्यासाठी सहकार्य करण्याचे आवाहन पोलीस अधिक्षक निलेश तांबे यांनी केले. तसेच सोशल मीडियावर अफवा पसरविणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्यात येईल, असा इशाराही त्यांनी यावेळी दिला.

बकरी ईदच्या दिवशी कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होणार नाही यासाठी आवश्यक उपाययोजना आणि समन्वय साधण्याबाबत शातंता समिती सभामध्ये सविस्तर चर्चा करण्यात आली. यावेळी विविध प्रतिनिधींनी आपले विचार मांडत शांततेत व सलोख्यात बकरी ईद साजरी करण्याचा संकल्प व्यक्त केला.

spot_img

Related Articles

लोकप्रिय

error: Content is protected !!